

पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर भोसे खिंड हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी भररस्त्यात चारचाकी वाहन उभे करून मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावत नाचगाणी व आरडाओरडा केल्याची घटना घडली. सार्वजनिक शांततेचा भंग तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
राम जितेंद्र गोळे (वय 20), रोहीन मिलिंद कांबळे (वय 20), शंकर देवानंद कोळी (वय 23), पवन आनंदा अनपट (वय 20), शुभम उर्फ साहील सुभाष गायकवाड (वय 21), उद्धव रामदास कार्य (वय 21), आयुष महेश काळभोर (वय 20) आणि साहील सुशील चव्हाण (वय 21, सर्व रा. सातारा जिल्हा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी मुख्य चौकात, पाचगणी ते महाबळेश्वर मार्गावर संबंधितांनी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन रस्त्यामध्ये उभे केले होते. वाहनातील साऊंड सिस्टीम मोठ्या आवाजात लावून नाचगाणी व आरडाओरडा करत त्यांनी सार्वजनिक शांततेचा भंग केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या सूचनांनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे यांनी तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. घटनेनंतर संबंधित तरुण घटनास्थळावरून पसार झाले होते.
मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यांची ओळख पटवली. हे सर्व सातारा जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.