

वेलंग : वाई-वाठार रस्त्यावरील ओझर्डे गावच्या हद्दीतील श्री स्वामी समर्थ मठ, कदमवाडीनजीक असलेल्या पुलाला संरक्षक कठडा नसल्यामुळे चारचाकी गाडी थेट ओढ्यात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र चालक जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 11 सीपी 9368 क्रमांकाची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना संरक्षक कठडा नसल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बाजूच्या ओढ्यात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला गाडीतून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
अपघातातील चालकाचे नाव समजू शकले नसले तरी तो नांदवळ (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील रहिवासी असल्याचे समजते. हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून, भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने संरक्षक कठडा उभारावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे.