

सातारा : नवीन शैक्षणिक वर्षास सोमवार दि. 16 जूनपासून प्रारंभ होत आहे. उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. रविवारी सातारा बसस्थानक सकाळपासूनच प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले होते. मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
पुणे-बंगळूर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाची ओळख आहे. सातारा बसस्थानकातून बेळगाव, विजापूर, गोवा, हैद्राबाद, सोलापूर, नांदेड, लातूर, परभणी, कोकणात दररोज बसेस ये-जा करत असतात. सोमवारपासून शाळा व विद्यालये सुरु होत आहेत. उन्हाळी सुट्टीसाठी गावाकडे आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वहात होते. पुणे, मुंबईकडे जाणार्या फलाटावर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार्या सर्व बसेस हाऊसफुल्ल भरून वाहताना दिसत होत्या.
सातारा आगारातून सातारा स्वारगेट मार्गावर दररोज 50 बसेस जात असतात. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दर 15 मिनिटाला जादा बसेस सोडण्यात येत होती. तसेच बाहेरील आगाराच्या बसेसही स्वारगेटकडे सोडण्यात येत होत्या. त्याचबरोबर मुंबईकडे दररोज सातारा आगाराच्या 12 व मुंबई आगाराच्या बसेस धावत असतात प्रवाशी उपलब्धतेनुसार मुंबईकडे जादा बसेस सोडण्यात येत होत्या. गर्दीच्या पार्श्वभूमीवर सातारा आगारासह विभागीय कार्यालयातील अधिकारी बसस्थानकावर तळ ठोकून होते.