

नातेपुते : नीरा उजव्या कालव्यात शुक्रवारी पहाटे बुडालेल्या कारमधील बेपत्ता महिलेचा मृतदेह अखेर नीरा कालव्यातच सुमारे वीस किलोमीटर अंतरावरील भांबुर्डी परिसरात 36 तासांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी दुपारी सापडला. यामुळे त्या अपघातातील मृतांच संख्या आता तीन झाली आहे. या दुर्घटनेत कारच चालक मात्र बचावला आहे.
मुंबईहून नातेपुतेमार्गे फोंडशिरसकडे कारद्वारे सुनील टिळेकर त्यांच्या पत्नी प्रिती तसेच सुनील यांचे सासरे हनुमंत जठार आणि सासू मंजूळा हे चौघे निघाले होते. नातेपुतेजवळ नीरा उजव्या कालव्यात पहाटेच्या सुमारास त्यांची कार कोसळली. या अपघातात हनुमंत आणि मंजूळा जठार यांचे मृतदेह शुक्रवारीच सापडले होते. मात्र, प्रिती टिळेकर यांचा मृतदेह न सापडल्याने त्यांची पोलिस दफ्तरी त्यांची नोंद बेपत्ता अशी करण्यात आली होती.
दुसऱ्या बाजूला पोलिस यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ प्रिती यांचा कालव्याच्या पाण्यात शोध घेत होते. पाण्याचा मोठा वाहता प्रवाह असल्याने प्रीती टिळेकर पाण्यात प्रवाहात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करत त्यांची नोंद बेपत्ता अशी केली होती. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पंंढरपूर येथील शोध पथक, पट्टीचे पोहणारे यांची मदत घेतली. शोध पथकाद्वारे तब्बल 36 तासांची शोध मोहिम सुरू होती.
पथकाच्या सदस्यांनी नीरा उजव्या कालव्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी तळापर्यंत शोध घेण्याच प्रयत्न केला. अखेरीस शनिवारी प्रिती यांचा मृतदेह नीरा उजव्या कालव्याच्या पृष्ठभागावर तरंगताना आढळून आला. नातेपुते पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नातेपुते ग्रामीण रूग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी विशाल वायकर करीत आहेत.