

सातारा : गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे कठापूर योजना) समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना फेज 2 मध्ये करणे आणि उरमोडी मोठा प्रकल्प तिसर्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावाला जलशक्ती मंत्रालयामार्फत मान्यता देणे या दोन प्रमुख मागण्यांसह, कृष्णा नदीचे प्रदूषणरहित सौंदर्यीकरणाकरता स्वतंत्र स्वायत्त संस्थेची स्थापना करून, नमामी गंगाच्या धर्तीवर नमामी कृष्णा योजना राबवण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांच्याकडे निवेदन दिले.
केंद्रीय मंत्री ना. सी. आर. पाटील यांची खा. उदयनराजे भोसले यांनी समक्ष भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दुष्काळी भागाला वरदान ठरणार्या गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना प्रकल्पास दि. 11 फेब्रुवारी 1997 रोजी प्रथम प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली, तसेच दि.11 ऑक्टोबर 2024 रोजी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे या योजनेमध्ये 32937 हे. क्षेत्राची वाढ झाली आहे. या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या फेज 2 मध्ये समावेश झाल्यास सातारा जिल्ह्यातील माण, खटाव,कोरेगाव व सातारा या दुष्काळग्रस्त भागातील सुमारे 32937 हे. क्षेत्र ओलीताखाली जाऊन याचा 176 गावांना लाभ होणार आहे. या योजनमध्ये 11 उपसा सिंचन योजना आहेत, 3 बॅरेज, 4 गुरुत्वीय उपनलिका आहेत. येरळा नदीवर 15 के.टी वेअर तसेच माण नदीवर 17 के.टी. वेअर आहेत. वर्धनगड बोगदा, आंधळी बोगदा यांचा देखिल सामावेश यामध्ये आहे. या प्रकल्पाचे पाणी माण व येरळा नदीत सोडण्यात येत आहे.
तसेच उरमोडी मोठा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावास जलशक्ती मंत्रालयाची मान्यता आवश्यक आहे. उरमोडी धरण 9.96 टी एम सी चे असून सातारा जिल्ह्यातील 27750 हे. जमीन ओलीताखाली येणार आहे. कण्हेर जोड कालवाव्दारे बोगद्यामधून कण्हेर डावा कालव्यामध्ये नेऊन तेथून पुढे आरफळ डावा कालवा कि.मी.45 येथून उरमोडी उपसा सिंचन योजनेंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथे दोन टप्प्यात 450 फूट पाणी उचलून खटाव, माण भागातील दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे. या उरमोडी मोठा प्रकल्पाच्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास दुष्काळग्रस्त भागाचा निश्चितच कायापालट होणार आहे, या दोन्ही बाबींकरीता भरघोस निधी केंद्राने वितरीत करावा, अशी मागणी सुध्दा खा. उदयनराजे भोसले यांनी ना सी. आर. पाटील यांच्याकडे केली.
उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत आपण सकारात्मकतेने योग्य निर्णय घेवू, असे आश्वासन यावेळी ना.पाटील यांनी दिले. याप्रसंगी काका धुमाळ, अॅड. विनीत पाटील, करण यादव उपस्थित होते.