

खंडाळा : राष्ट्रीय महामार्गावर पारगाव -खंडाळ्याच्या हद्दीत शनिवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले. त्यामुळे खंबाटकी घाटात मेगा ब्लॉक होऊन तब्बल 13 तास वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. रात्री 11 वाजल्यापासून विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कोलमडून पडली. परिणामी, सुमारे दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक संतप्त झाले. अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवले.
खंडाळ्याजवळ असणाऱ्या जुन्या टोलनाका परिसरात शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले. त्यामुळे पुण्याच्या बाजूकडून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या वाहतुकीवर परिणाम झाला. शनिवारी रात्री झालेल्या या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्त वाहने बाजुला करणे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खंडाळा व महामार्ग पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तरीही वाहने हटवण्यात अपयश आले. दरम्यान, सकाळी वाहनांची वर्दळ वाढू लागली. रविवारी सुट्टीचा दिवस आणि लग्नाची मोठी तिथी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या मोठी होती.
रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 अशी वाहतुकीची प्रचड कोंडी झाली होती. वाहनांच्या 10 किमीच्या रांगा लागल्याचे चित्र होते. केवळ महामार्गच नव्हे तर सर्व्हिस रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला. वाहन चालक जागा मिळेल तेथून आपले वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून कोंडी आणखी वाढली. त्यामुळे वादावादी, हमरीतुमरीचे प्रसंग उद्भवले.
दरम्यान, खंडाळा पोलीस ठाण्याचे चंद्रकांत धापते, प्रकाश फरांदे, संजय जाधव, दिग्विजय पोळ, गोविंद आंधळे, महामार्ग पोलीस पी.एस.आय. एस.बी.गोरड, संजय धुमाळ, हेमंत ननावरे, मिथून मोरे, संताजी कचरे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.