

ढेबवाडी : ग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणार्या ग्रामपंचायतींना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून देश पातळीवर देण्यात येणार्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. त्याचबरोबर ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही या गावास जाहीर झाला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे बुधवारी या गावाचा गौरव होणार आहे.
भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून ग्रामस्तरावरील विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर आधारित असलेल्या गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक न्याय व सामाजिकद़ृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव व महिला स्नेही गाव या बाबींवर विशेष काम करत शाश्वत विकासाची गावे निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाते. या निकषानुसार गौरवास्पद कामगिरी करणार्या गावांची शासनाकडून तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कारासाठी मान्याचीवाडीची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून या पुरस्कारांसाठी निवड करताना मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राबविलेलया योजनांची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीला 1 कोटी 50 लाखांच्या सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार घोषित करण्यात आला.
त्याचबरोबर राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेल्या आणि अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे प्रभावी काम केल्याबद्दल 1 कोटी रुपयांचा प्रथम क्रमांकाचा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांसाठी यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे, गटविकास अधिकारी सविता पवार, अनिल वाघमारे, राज्य समन्वयक अनिल बगाटे,श्रीधर कुलकर्णी,अमीर शेख, संतोष सकपाळ, बाळासाहेब बोराटे, जोती पाटील, मधुकर मोरे आदिंचे मार्गदर्शन लाभले.