उंडाळे : कराड तालुक्यातील उंडाळे, तुळसण परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. शनिवारी सायंकाळी पाचुपतेवाडी येथील महिलेवर हल्ला करून बिबट्याने त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे लावले आहेत.
सौ. सुनंदा कृष्णत मोरे (वय 54) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या आपल्या पतीबरोबर उंडाळे येथे दवाखान्यात येत असताना त्यांच्या गाडीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल््यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराडला हलवण्यात आले. याच परिसरात उंडाळे येथील युवक अक्षय पाटील शेतात पाणी पाजत असताना बिबट्याने हल्ला केला होता. मात्र, बिबट्याचा पंजा युवकाच्या जर्किनमध्ये अडकल्याने व त्याने आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. तर येथील शेतकरी शामराव पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याने शेळीवर हल्ला केला होता. यात शेळी ठार झाली.
या घटनांची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपवनसंरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या सूचनेनुसार वनपाल दिलीप कांबळे, वनरक्षक अभिनंदन सावंत तसेच आरआरटी टीममधील मयूर जाधव, किरण गरूड, रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, डब्ल्यूआरके सदस्य वनसेवक गणेश काळे, हणमंत कोळी यांनी परिसराची पाहणी केली.
बिबट्याच्या नियमित हालचाली लक्षात घेऊन त्याच्या ये-जा मार्गावर तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, एकट्याने शेतात किंवा अंधाऱ्या भागात जाणे टाळावे, तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.