

पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात पश्चिम वीजनिर्मिती लवादाच्या पाणी कोट्याची मर्यादा संपुष्टात आली असली, तरी उपयुक्त पाणीसाठा 11.30 टीएमसी इतका असून, जूनअखेर सिंचन आणि वीजनिर्मितीची गरज भागविली जाऊ शकते. धरणामध्ये आजमितीला 11.30 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा असून, जूनअखेर सिंचन आणि वीजनिर्मितीची गरज भागविली जाऊ शकते. त्यासाठी अतिरिक्त पाणी वापरासाठी मंत्रालयस्तरावर हालचाली सुरू आहेत.
यापूर्वी अतिरिक्त पाणी वापरास मिळालेल्या परवानगी लक्षात घेता यावर्षीही परवानगी मिळणार, अशीच चिन्हे आहेत. पश्चिम जलविद्युतनिर्मितीचा आरक्षित पाणी कोटा संपला असला, तरी अचानकपणे संपूर्ण वीजनिर्मिती बंद करणे नैसर्गिक व तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे वीजनिर्मिती मर्यादित प्रमाणात का होईना; पण सुरूच राहणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात पावसाळ्यात सुमारे 188.45 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. आजवर पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.48, पूर्वेकडे सिंचनासाठी 32.87, पूरकाळात 14.53, आपत्कालीन विमोचक दरवाजातून सिंचनासाठी 6.91 टीएमसी अशाप्रकारे पाणी वापर झाला. सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी कमी झाल्याने आपत्कालीन दरवाजातून सोडण्यात येणारे सिंचनासाठीचे पाणी सध्या बंद आहे. यावर्षी विनावापर 64.67 टीएमसी पाणी सोडून दिले आहे.
पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी पाणी वाटप लवादाच्या आरक्षणानुसार 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते, यापैकी आतापर्यंत 67.48 टीएमसी पाणी वापर झाल्याने आता पश्चिम आरक्षित कोटा संपला आहे. सध्याचा उपयुक्त 11.30 टीएमसी पाणीसाठा लक्षात घेता सिंचनासाठी सरासरी 6 टीएमसी पाणी वापर होतो. पश्चिम वीजनिर्मितीसाठी दरमहा सरासरी 5 टीएमसी पाणी वापर होतो. सध्याचा एकूण उपयुक्त पाणीसाठा लक्षात घेता जूनअखेर कोयनेच्या पाण्याची चिंता नाही, हे या तांत्रिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.