

पाटण : सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नदीकाठी गेलेल्या दोन शाळकरी मित्रांवर नियतीने घाला घातल्याची दुर्दैवी घटना कोयना विभागातील गाडखोप येथे घडली. कोयना धरण परिसरातील कोयना नदीत पोहण्यासाठी गेले असता गाडखोप गावातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
करण दाजी कदम (वय 15) व आर्यन अनिल कदम (16) हे दोन शाळकरी मित्र कडक उन्हामुळे नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल भागात गेले आणि पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडाले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स.पो.नि. एस. के. ओलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नदी परिसरात शोधमोहीम राबवली. बराच काळ सुरू असलेल्या या शोध प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्दैवी घटनेने गाडखोप गावावर शोककळा पसरली असून, संबंधित कुटुंबासह गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.