

गणेशचंद्र पिसाळ
पाटण : कोयनेसह महाराष्ट्रात यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी सध्यस्थितीत धरणात मुबलक पाणी आहे. मात्र त्यानंतरही मागील आठ महिन्यांत तब्बल 149.629 दशलक्ष युनिट वीज कमी निर्माण झाली आहे.
या जलवर्षात पश्चिमेकडे 24.33 टीएमसी पाण्यावर 1149.033 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली, तर गतवर्षी 29.25 टीएमसी पाण्यावर 1348.491 दशलक्ष युनिट निर्मिती झाली होती. त्यामुळे पश्चिमेकडे 4.43 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने मोठी वीज तूट निर्माण झाली. सिंचन व पूरनियंत्रणासाठी 27.46 टीएमसी पाण्यावर 133.874 दशलक्ष युनिट वीज तयार झाली असून गतवर्षीपेक्षा 49.829 दशलक्ष युनिट वाढ नोंदली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा एकत्रित विचार करता वीज निर्मिती कमी झाल्याने झालेली तूट भरून काढावी, अशी जोरदार मागणी होत आहे.