

पाटण : मागील तांत्रिक जलवर्षात सिंचनासाठी पाण्याचा कमी वापर झाला. मे महिन्यातच पाऊस सुरू झाला तो आतापर्यंत सुरूच आहे. त्यामुळे धरणात तुलनात्मक पाण्याची आवक व साठा वाढलेला आहे. गतवर्षी यावेळी 16 टीएमसी पाणीसाठा होता. तोच यावेळी 33 टीएमसी इतका आहे. हा पाणीसाठा व पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही आणि जुलै, ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर सध्याचा जादा पाणीसाठा भविष्यातील पूर, महापुरासाठी आमंत्रण ठरू शकतो अशाही शक्यता व्यक्त होत आहेत. एका बाजूला पाणी सोडावे तरी अडचण आणि दुसरीकडे नाही सोडावे तरी अडचण अशा द्विधा मानसिकतेत असणार्या प्रशासनाला यासाठी नैसर्गिक व तांत्रिक अभ्यास करूनच ठोस नियोजन व उपाय योजनांची गरज असल्याचे मत जल तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
मागील दहा वर्षांपासून कोयना धरणांतर्गत विभागासह सर्वत्र निसर्गामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. यापूर्वी सरासरी जून ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पाऊस व्हायचा. मागील दहा वर्षांची सरासरी पाहिली तर जूनच्या सुरुवातीला पावसाची काही प्रमाणात सुरुवात होते. मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस हा शक्यतो जुलैच्या दुसर्या पंधरवड्यानंतर सुरू आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि धरणात त्याचपटीत पाण्याची आवक वाढते. ऐनवेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागते. तर दुसरीकडे इतरत्र पडणारा पाऊस त्यामुळे कित्येकदा पूर, महापुराच्या शक्यताही निर्माण झाल्याचा इतिहास आहे. यावेळी मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापासून तुफान पावसाने सुरुवात केली ती आतापर्यंत तशीच सुरू आहे. या पावसामुळे सिंचनासाठीचा पाणीवापर कमी झाला. गतवर्षीपेक्षा या नव्या तांत्रिक जलवर्षात मुळातच अधिकचा पाणीसाठा शिल्लक असताना याच दरम्यान पडलेला पाऊस, धरणातील आवक व सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 22 टीएमसी ज्यादा पाणीसाठा सध्या धरणात शिल्लक आहे. येणार्या काळात निश्चितच हा ज्यादा पाणीसाठा आगामी काळातील पूर, महापुरासाठी आमंत्रण ठरू नये याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
सध्या धरणात सरासरी प्रतिसेकंद 16,533 क्यूसेक पाण्याची आवक होत असताना दुसरीकडे पश्चिम वीजनिर्मिती व पायथा वीजगृहातून पूर्वेकडे सोडण्यात येणार्या पाण्यापेक्षाही धरणात येणारे पाणी तुलनात्मक पटीत कितीतरी ज्यादा आहे. या सर्व गोष्टींचा समतोल राखताना निश्चितच प्रशासन, धरण व्यवस्थापनाला कसरत करावी लागत आहे. पावसाचे चक्र बदलले असले तरीही जुलै, ऑगस्टमध्ये पावसाच्या कमी अधिकच्या शक्यता गृहीत धरूनच आतापासूनच ठोस नियोजन तितकेच गरजेचे बनले आहे.
सध्या धरणात तुलनात्मक ज्यादा पाणीसाठा झाला आहे. भविष्यातील पाऊस व येणार्या पाण्याची आवक लक्षात घेता आताच कमीत कमी पाणीसाठा ठेवण्याचे नियोजन गरजेचे आहे. यावर्षी मे महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सरासरी जुलै, ऑगस्टमध्ये पडणारा पाऊस यादरम्यान झाला असण्याच्या शक्यताही व्यक्त होत आहेत. त्यामुळे आतापासूनच पाणी सोडले तर भविष्यात पूर महापुराचा धोका कमी होऊ शकतो, अशी एक बाजू आहे. तर दुसरीकडे आताच पाणी सोडले आणि भविष्यात त्या पटीत पाऊस पडला नाही तर पाण्याअभावी आगामी काळात सिंचन व वीज निर्मितीची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे धरण व्यवस्थापनाची तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे.
उपलब्ध पाणीसाठाः 38.33 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा : 33.33 टीएमसी
पाणीउंची : 2091.3 फूट
जलपातळी : 637.413 मीटर
प्रतिसेकंद आवक - 16,533 क्यूसेक
एक जूनपासून झालेला पाऊस
कोयना 911 मिलिमीटर
नवजा - 912 मिलिमीटर
महाबळेश्वर 876 मिलिमीटर.
धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 66.92
टीएमसी पाण्याची गरज.