

पाटण : कोयना धरणात पाण्याचा अत्यल्प साठा असल्याने सिंचन व वीजनिर्मितीबाबत प्रश्नचिन्ह असताना आता आगामी काळातील पाऊस व उपाययोजना या पार्श्वभूमीसह सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी कमी झाल्याने मंगळवारी दुपारपासून कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्युसेक सोडण्यात येणारे पाणी आता केवळ दिवसातील बारा तासच सुरू राहणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
सध्या कोयना धरणात उपलब्ध १४.१३ टीएमसी तर उपयुक्त ९.०१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यानंतरही अद्याप मान्सून पूर्व अथवा मान्सूनचा पाऊस पडला नसल्याने पाण्याविषयी सार्वत्रिक चिंता व्यक्त होत आहे.
धरणातील शिल्लक पाणीसाठा आगामी काळात पुरवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता दिवसातील चोवीस पैकी केवळ बारा तासच पूर्वेकडे धरण पायथा वीज गृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून पाणी सोडण्यात येणार आहे. चोवीस तासांचा विचार करता प्रतिसेकंद सरासरी ५२५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.