

गणेशचंद्र पिसाळ
पाटण : अल् निनोचा धोका व हवामान खात्याच्या कमी पावसाच्या अंदाजामुळे सार्वत्रिक चिंता असतानाही कोयना धरणातील पाण्यावर विसंबून निम्म्याहून अधिक महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांची पाणी चिंता मिटली आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणासाठी १ जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक जलवर्षात आतापर्यंत सुमारे १२० टीएमसी पाण्याची आवक झाली असून सरासरी इतकाच पाऊस झाला आहे. जून महिन्यात धरणात केवळ ०.६० टीएमसी इतक्याच पाण्याची आवक झाली होती; मात्र जुलैमध्ये सुमारे ७५, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत ४४ अशी आतापर्यंत एकूण ११९.६० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
एक जूनपासून सुरू झालेल्या नव्या वर्षारंभाला धरणात १५.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मधल्या काळात पश्चिमेकडील जलविद्युत निर्मिती पूर्णपणे बंद केली होती, तर सिंचनामध्ये शेती व औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणीही पूर्णपणे बंद करून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी सोडले होते. या जलवर्षात आतापर्यंत १२० टीएमसी पाण्याची आवक झाली असून त्यापैकी पश्चिम वीजनिर्मितीसाठी ५.८२ टीएमसी पाण्याचा वापर करून त्यातून २८२.२२१ दशलक्ष युनिट, तर पूर्वेकडे त्या काळात सिंचनापेक्षाही पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी १.३१ टीएमसी व पूरकाळात धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सोडलेल्या १.७७ अशा एकूण ३.०८ टीएमसी पाण्यावर १२.४६१ दशलक्ष युनिट अशा प्रकारे चारही जलविद्युत प्रकल्पांसाठी ८.९० टीएमसी पाण्यावर एकूण २९४.६८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.