

पाटण : कोयना धरणांतर्गत जलाशयात यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला, तरी तुलनात्मक ज्यादा पाण्याची आवक व मुबलक पाणीसाठा झाल्याची समाधानकारक परिस्थिती असल्याने गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 31.265 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे.
या जल वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 10.61 टीएमसी पाण्यावर 494.455 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी 10.47 टीएमसी वर 487.043 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 0.14 टीएमसी पाणीवापर ज्यादा झाल्याने 7.412 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे.
पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते.यावर्षी आतापर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही, तथापी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पूरकाळात सोडलेल्या 8.96 टीएमसी पाण्यावर 41.813 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या 1.16 व पूरकाळातील 3.27 अशा एकूण 5.43 टीएमसी पाण्यावर 18.960 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 3.53 टीएमसी पाणीवापर जादा झाल्याने 22.853 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता चालू तीन महिन्यात एकूण 19.57 टीएमसी पाण्यावर 536.268 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.
गतवर्षी 15.90 टीएमसी पाण्यावर 505.003 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत 3.67 टिएमसी पाणीवापर जादा झाला असून 31.265 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
आतापर्यंत 48 टीएमसी पाणी गेले वाया
आजपर्यंत वर्षानुवर्षे विनावापर शेकडो नव्हे, तर तब्बल हजारो टीएमसी पाणी हे पूर्वेकडे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमार्गे समुद्रात वाहून गेले आहे. यावर्षी ऑगस्ट अखेर 48 टीएमसी पाणी विनावापर वाया गेले आहे. समुद्राला वाया जाणार्या याच पाण्याचा कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यालाही कोणताही फायदा नव्हे, तर तोटाच होतो. त्यामुळे केवळ लवादाचा बागुलबुवा करण्यापेक्षा यासाठी सकारात्मक प्रयत्न गरजेचे आहेत. निदान यापुढे तरी राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन येणार्या काळात किमान या विनावापर अतिरिक्त पाण्याचा फायदा उठवावा, अशा संतप्त अपेक्षा सामान्यांसह अभ्यासकांकडूनही व्यक्त होत आहेत.
..तर राज्याला अब्जावधींचा फायदा
मोठ्या प्रमाणावर वाहून जाणार्या पाण्यामुळे अब्जावधींच्या जीवित व वित्त हानीतून वैयक्तिक व सार्वजनिक तोटाच झाला आहे. अति पावसाच्या काळात जर राज्य शासनाने राज्यातील महागडे कोळसा, गॅस, थर्मलसारखे वीजनिर्मिती प्रकल्प बंद ठेवून कोयनेच्या फुकटच्या पाण्यावर अतिरिक्त जलविद्युत निर्मिती केली आणि लवादाच्या पाणी कोट्यातून ते पाणी वजा केले, तर राज्याला अब्जावधींचा फायदा होईल. नुकसानीचा तोटा व अतिरिक्त वीजनिर्मितीमुळे अब्जावधींचा फायदा असा दुहेरी फायदा शक्य आहे.