

कोरेगाव : येत्या १३ महिन्यात जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या भाडळे व नलवडेवाडी उपसा जलसिंचन योजना पूर्ण होणार असून, साडेबावीस लाख टन ऊसाचे उत्पन्न आता शेतकरी काढू शकणार आहेत. तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणला जाणार असून, या तालुक्याचा हा शेवटचा दुष्काळ आहे, असे ठाम प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले.
जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या भाडळे उपसा जलसिंचन योजना, नलवडेवाडी उपसा जलसिंचन योजना आणि चिलेवाडी-रेडेघाट ते कोरेगाव या प्रमुख जिल्हा मार्गाचे ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे, विक्रम पावस्कर, रामकृष्ण वेताळ, सोळशी येथील सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज, सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, अमित चव्हाण, सौ. सारिका फाळके, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, राहुल कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, विरोधकांनी आजवर पाण्याच्या विषयावर राजकारण केले, निवडणूक आली की, डोंगराच्या पायथ्याला यायचे आणि फकी मारायची आणि आपले सोईचे राजकारण करुन निघून जायचे, याला आम्ही सर्वात प्रथम छेद दिला. विरोधकांनी टिका केली तरी आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही, मात्र जिहे-कठापूर योजनेचे ७० टक्के पाणी आपल्याला मिळाले आहे. आजपर्यंत तालुक्याला हक्काचे पाणी नव्हते, मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा खोर्यातील पाण्याचा फेर आढावा घेतला आणि तब्बल दोन टीएमसी पाणी मिळवले. आजवर धरणे झाली जिल्ह्यात, पुनर्वसन झाले कोरेगाव तालुक्यात, मात्र २२ पुनर्वसीत गावांना पाणी नव्हते, त्यांना पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करु शकलो, याचा आनंद आहे.
डॉ. सौ. प्रिया शिंदे म्हणाल्या, कोरेगाव तालुक्याचा पाणी प्रश्न आता पूर्णपणे निकाली निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त स्वयंपाकगृह उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण सातारा जिल्हा कर्करोगमुक्त आणि मधुमेहमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, आ. रवींद्र चव्हाण यांचा भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला. महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास विजयराव घोरपडे, विलास पवार, चंदुकाका पवार, धनाजी मोहिते, धनसिंग कदम, कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक सचिन बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, संतोष बर्गे, अजित बर्गे यांच्यासह कोरेगाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.