

सातारा : गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण सोमवारी रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांचा पाणीटंचाईचा प्रश्न तूर्तास संपुष्टात आला आहे. धरण भरल्याने सातार्यातील नगरसेवकांना ओटी भरणाचे वेध लागले आहेत.
कास धरणाची उंची वाढवल्यामुळे धरणात ०.५ टीएमसी पाणीक्षमता निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. गेल्या आठवड्यापासून कास धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पावसाची आवक झाली आहे. परिणामी, सोमवारी रात्री उशिरा कास धरण पूर्ण क्षमतेने भरले. कास धरण हा सातारकरांना पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा स्रोत आहे.
धरण भरल्याने आगामी काळात शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या सुरू असलेली पाणी कपात बंद करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. धरण भरल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर धरणाची ओटी भरण्याचा कार्यक्रम लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली.