

कराड : मागील काही दिवसांपासून सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील नाव समाविष्ट व्हावे, यासाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळेच गावागावांत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, ठरावावरून मतभेदही समोर येत असल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी कराड तालुक्यात मागील अडीच वर्षात भाजप अधिक मजबूत झाली असून, याचे परिणाम जिल्हा बँक निवडणुकीतही पहावयास मिळणार आहेत.
सोसायटी गटातील गमावलेले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी मागील निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा यांची भूमिका या निवडणुकीतही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच ते स्वतः किंग होणार की पुन्हा किंगमेकरची भूमिका बजावणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकारणात कधी कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, तसाच तो शत्रूही नसतो हे कराड तालुक्याने अनेकदा अनुभवले आहे. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी कराड नगरपालिकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना धोबीपछाड देण्यासाठी व्यूहरचना आखत भाजप विरोधकांना हाताशी धरले होते.
कराड नगरपालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांच्यासह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना यशही मिळाले. तर मलकापूर नगरपरिषदेतील निकालानंतर भाजपवर आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यामुळे आली होती. या दोन्ही निवडणुकीत टोकाचा विरोध केल्यानंतर मे महिन्यात अनपेक्षितपणे अॅड. उदयसिंह पाटील यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह त्यांचे वडील कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्याशी जुळवून घेतले. नुसते जुळवून घेतले नाही, तर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारासाठी जाहीर सभासुद्धा अॅड. उदयसिंह पाटील यांनी घेतल्या.
त्याचवेळी दुसरीकडे कराड नगरपालिका निवडणुकीनंतर मागील पाच वर्षापासून एकत्र आलेल्या आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटामध्ये मिठाचा खडा पडला होता. कारखाना निवडणुकीत सहकार्याची भूमिका घेत जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याशी जुळवून घेतले आहे. स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या पश्चात नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रथमच तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरत अॅड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला होता. या पराभवामुळे जवळपास चार दशकाहून अधिक काळ सोसायटी गटातील उंडाळकर घराण्याच्या वर्चस्वाला हादरा बसला होता. या निवडणुकीत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निर्णायक भूमिका बजावली होती आणि तेच या निवडणुकीत किंगमेकर ठरले होते. मात्र मागील पाच वर्षात तालुक्याचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे.
विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याचवेळी कराड उत्तरला भाजपने मनोज घोरपडे आणि धैर्यशिल कदम यांच्या रूपाने दोन आमदार दिले आहेत. तर कराड दक्षिणेचे प्रतिनिधीत्व स्वतः जिल्हाध्यक्ष अतुलबाबा हेच करत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बहुमतापासून दूर रहावे असून प्रथमच पंचायत समितीवर भाजपने झेंडा फडकविला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील हे कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याचवेळी अॅड. उदयसिंह पाटील यांनी सोसायटी गटातून लढण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली असून ठरावावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांच्यासह भाजपाने ते रामकृष्ण वेताळ यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर यांना साथ दिली होती. त्याचवेळी भाजप आमदार डॉक्टर अतुलबाबा यांनी तत्कालीन आमदार बाळासाहेब पाटील यांना साथ दिली होती. मात्र आता डॉक्टर अतुलबाबा आणि उंडाळकर गट एकत्र आल्याने सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी गटातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बाळासाहेब पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागेल अशी चिन्हे आहेत.
मात्र राजकारणात काहीही होऊ शकते आणि कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या साखर कारखान्यापैकी एक कारखाना असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे स्वतः निवडणूक रिंगणात उतरणार की पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.