

कराड : पर्यावरण रक्षणासह निरोगी आरोग्याचा संदेश देत कराडमधील ध्येयवेड्या युवकांनी कराड ते कन्याकुमारी असा केलेला सायकल प्रवास निश्चितच आदर्शवत आहे. या मोहिमेपासून प्रेरणा घेत युवा पिढीने पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी केले आहे.
निसर्ग वाचवा...भविष्य वाचवा असा संदेश देत दैनिक पुढारीचे सहाय्यक उपसंपादक चंद्रजीत पाटील यांच्यासह तेजस गुरसाळे, अतुल बाबर आणि अतुल देशमुख या चौघांनी नुकताच कराड ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे. या मोहिमेनंतर दैनिक पुढारी कार्यालयात चंद्रजीत पाटील यांचा सौरभ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक पुढारीचे ब्युरो मॅनेजर सतीश मोरे, वरिष्ठ उपसंपादक अमोल चव्हाण, उपसंपादक अशोक मोहने, प्रतिभा राजे, संतोष कुलकर्णी, अर्जुन काटवटे, गणेश पाटील, विशाल देशमुख, स्वप्नाली पाटील, धनाजी चव्हाण उपस्थित होते.
सतीश मोरे यांच्यासह दैनिक पुढारी कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश मोरे यांनी कराड ते कन्याकुमारी या सायकल मोहिमेचा उद्देश आणि ध्येय निश्चितच कौतुकास्पद आहे. यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. हे यश इतरांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. आज आरोग्यासह पर्यावरणाच्या हानीकडे होणारे दुर्लक्ष चिंतेचा विषय बनला असतानाच चंद्रजीत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेला सायकल प्रवास इतरांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.
तर सौरभ पाटील यांनी अशा धाडसी मोहिमांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होऊन समाजातील लोकांना नवी दिशा व ऊर्जा मिळण्यास मदत होते. कराडकरांसाठी निश्चितच ही अभिमानास्पद बाब असून भविष्यात कराडकरांना अशा धाडसी मोहिमांमुळे प्रेरणा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. अशोक मोहने यांनी सूत्रसंचालन केले.