

कराड : कराड शहरातील वाहतूक कोंडीमुळे आणि वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यात कमी पडलेल्या वाहतूक शाखेमुळे शहरात अपघाताची मालिका सुरू असून वाहनचालकांच्या जीवावर बेतले आहे. रस्त्यात उभा करून प्रवाशी भरणारे व उतरणारे रिक्षाचालक, रस्त्याच्या कडेला असणारे बेशिस्त पार्किंग, सिग्नल चौकातील दुकाने आणि रिक्षा थांबे याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. मात्र वाहतूक पोलिसांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. बुधवारी शहरात झालेल्या अपघातात एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती शाहू चौकात उद्भवण्याची शक्यता आहे.
कराड शहरातील मध्यवर्ती व अत्यंत वर्दळीचा असलेल्या शाहू चौकात नित्याची वाहतूक कोंडी होत असून याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. या चौकाच्या आसपास पंचायत समिती, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालये असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व वाहनांची ये-जा असते. परिणामी सकाळी दहा ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यानंतर शाहू चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते.
विशेषतः कार्यालयीन वेळेत दुचाकी, चारचाकी वाहने, रिक्षा तसेच खासगी वाहतूक एकाच वेळी चौकात दाखल होत असल्याने वाहने अक्षरशः रेंगाळतात. रुग्णवाहिका, शालेय वाहने व अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी नियमितपणे वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने उभी करतात. काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी रस्त्यावरच पार्क केल्या जात असल्याने कोंडी अधिकच वाढते. वारंवार ही कोंडी होत आहे. वाहतूक शिस्त लावण्यासाठी पोलीस कर्मचारी क्वचितच दिसतात, अशी तक्रार नागरिकांतून होत आहे.