

कराड : संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेता पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास प्राधान्य द्या, अशा सूचना आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री बळीराजा शेत व पानंद रस्ते योजना विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, उपसभापती अनिता वेताळ, मलकापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी सतीश जगताप तसेच जि.प.,पं.स.चे सदस्य, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आ.डॉ.भोसले म्हणाले, अधिकाऱ्यांनी संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. कराड तालुक्यात टंचाई परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या सात गावात टंचाई परिस्थिती आहे. याबाबत आवश्यक उपायोजना केल्या आहेत. कराड तालुका खूप मोठा आहे. पानंद रस्ते आणि शेत रस्ते खुले करण्यासाठी निधी कमी देणार नाही. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून उर्वरीत पाणी शेतीसाठी दिले जाईल. सर्वांसाठी घरे, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता याविषयावरही बैठकीत चर्चा झाली.
आ.घोरपडे म्हणाले, यावर्षी पाऊसकाळ कमी आहे. जुलै पर्यंत पिण्याचे व शेतीचे पाणी लोकांना मिळाले पाहिजे यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पाणी टंचाई ज्या गावात निर्माण होणार आहे, त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील त्या अनुषंगाने नियोजन केले आहे. पण त्यावर चर्चा होणे व कार्यवाही होणे अपेक्षित होते ती बैठकीत झाली.
तसेच शेत रस्ते व पानंद रस्ते खुले करण्याचे व त्यावर निधी टाकण्याबाबत चर्चा झाली. सर्वांसाठी घरे मिळाली पाहिजेत यासाठी शासनाच्या योजना आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण आहे. गायरान जमिनीमधील अतिक्रमणे असतील किंवा शासकीय जमिनीमधील अतिक्रमणे असतील 2011 पूर्वीची सर्व घरे नियमित करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. उपलब्ध पाणी साठ्याची माहिती देण्यात आली. अतुल म्हेत्रे यांनी पीपीटीव्दारे योजनांची माहिती दिली.