

कराड : स्मार्ट वीज मीटर बसविण्यास कराड विभागात सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत असतानाही वीज वितरण विभागाकडून विरोध झुगारून स्मार्ट मीटर बसविण्याचा धडका सुरू आहे. ग्रामसभांचे ठराव, आंदोलने तसेच कराड पंचायत समिती मासिक सभेचा ठराव, ग्रामसभांचे ठराव विरोध नोंदवूनही स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.कराड विभागातील कराड शहर, कराड ग्रामीण, उंब्रज, मल्हारपेठ, पाटण येथील 2 लाख 56 हजार 777 पैकी 90 हजार 640 ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले गेले आहेत.
ग्रामीण भागात खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत दुपारच्या वेळेत घरातील सदस्य नसताना मीटर बसवले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलले जात असून, हरकत घेतल्यास “जुना मीटर नादुरुस्त आहे” असे कारण सांगितले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही प्रक्रिया बळजबरीने राबवली जात असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. “स्मार्ट मीटर बसवू नयेत तसेच आधी बसवलेले मीटर तातडीने काढून घ्यावेत” अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या प्रश्नावर ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र असल्याचे आंदोलनातून स्पष्ट झाले. वसंतगड व लगतच्या सहा ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करून ग्रामसभांमध्ये तसा ठरावही केला आहे. पंचायत समितीच्या मासिक सभेतही स्मार्ट मीटर न बसविण्याचा ठराव करण्यात आला आहे. तरीही स्मार्ट मीटर बसविले जात आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार कराड विभागात 90 हजारहून अधिक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले गेले आहेत. मात्र, ग्राहकांना विश्वासात न घेता राबवली जाणारी ही मोहीम प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. विरोध असताना स्मार्ट मीटरची सक्ती का हा प्रश्नही उपस्थित झाला आहेे. प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधून, स्मार्ट मीटरबाबत भूमीका स्पष्ट करण्याची गरज आहे.