

कराड : सैदापूर (ता.कराड) ग्रामपंचायतीच्या वतीने लिगाडे-पाटील कॉलेज ते आसपासच्या शेती परिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी बांधण्यात आलेल्या बंदिस्त गटरच्या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यात शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी शेतामध्ये साचून राहत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. मात्र आता बंधिस्त गटरमुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून जात असल्याने शेतीतील पाणी साचत नाही आणि पिकांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टळले आहे.
यापूर्वी अनेक वर्षे शेतकर्यांना पावसाळ्यात शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे उत्पादन घटणे, मातीची धूप होणे तसेच शेतीकामात अडथळे निर्माण होण्याचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायतीने या समस्येची गांभीर्याने दखल घेत नियोजनबद्ध पद्धतीने बंदिस्त गटरची उभारणी केली. या कामाचा लाभ आता प्रत्यक्ष शेतकर्यांना होत असून शेती सुरक्षित राहण्यास मोठी मदत झाली आहे.
सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहेत. ग्रामपंचायत सैदापूरच्या माध्यमातून भविष्यातही शेती, पाणी व्यवस्थापन, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अशाच लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी दिली आहे.