

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सातारा जिल्ह्यात जलसिंचनाच्या ऐतिहासिक कामांना गती मिळाली आहे. मोठे व मध्यम प्रकल्प, कालवे, पाणी साठवण, सूक्ष्म सिंचन योजना यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला असून शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आले आहे. माण-खटावसह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्नावर भाजप सरकारने निर्णायक पावले उचलली आहेत. जनतेचे प्रेम असल्यामुळेच जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपची सत्ता येईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या सांगता प्रचारादरम्यान बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यात भाजपच्या माध्यमातून विकासाची नवी पहाट उगवली आहे. खऱ्या अर्थाने विकासाची कामे कोणी केली असतील तर ती फक्त भारतीय जनता पक्षानेच केली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक घटक, प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंब केंद्रस्थानी ठेवून भाजपने विकासाची दिशा ठरवली आहे. वर्षानुवर्षे माण आणि खटाव या तालुक्यांच्या माथी ‘दुष्काळी’ असा शिक्का मारला गेला होता. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी दुष्काळाचे राजकारण केले, पण शाश्वत विकास देण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. भारतीय जनता पक्षाने मात्र सत्तेत येताच या तालुक्यांची दुष्काळी ओळख कायमची पुसून टाकण्याचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबवून विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, ग्रामसडक योजना, विविध पायाभूत सुविधा विकास योजना, तसेच ग्रामपंचायत स्तरावरील मूलभूत सुविधा बळकट करण्याचे उपक्रम यांमुळे गावागावात बदल दिसू लागला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, घरे, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि रोजगारनिर्मिती या सर्व आघाड्यांवर ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ठोस कामगिरी करण्यात आली असल्याचे ना. गोरे म्हणाले.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, आपण सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना भाजपाचे मजबूत आणि शिस्तबद्ध संघटन उभे केले आणि त्याच संघटनाच्या बळावर आज सातारा जिल्हा विकासाचे फळ चाखत आहे. प्रत्येक घरात विकास आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणणे हेच भाजपाचे ध्येय असून, त्याच दिशेने सरकार आणि पक्ष एकत्रितपणे काम करत आहे. लोकांना केवळ घोषणा नकोत, तर कामाचा हिशेब हवा आहे आणि तो हिशेब भाजपाने दिला आहे. विरोधकांकडेे सांगण्यासारखी कामगिरी नसल्याने ते केवळ आरोपांची राजकारणे करत आहेत, तर भाजप प्रत्यक्ष मैदानात उतरून विकास करून दाखवत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही भाजपच्या यशस्वी वाटचालीला नवे शिखर गाठून देणारी ठरेल. सातारा जिल्ह्यातील जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना भरघोस पाठिंबा देईल, असा विश्वासही ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.