

औंध : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कुतूहल निर्माण झाले आहे. दरम्यान, औंधसह परिसरातील 21 गावांचा शेती पाणीप्रश्न मार्गी लावून प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गायत्रीदेवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगण्यात येते.
राजकन्या चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी यांच्यासमवेत गायत्रीदेवींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी औंधच्या योजनेची माहिती देताना सांगितले की, या परिसरास मागील अनेक दशकांपासून भेडसावत असलेल्या शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी स्व. अजितदादा पवार यांनी सन 2022 साली औंधसह 16 गावांसाठी कण्हेर धरणातून सव्वा टी.एम.सी. आरक्षित केले होते. माण तालुक्यातील दक्षिण व उत्तर खटाव तालुक्यातील अनेक गावे ओलिताखाली आली आहेत.
मात्र औंधसह परिसरातील 21 गावातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. जानेवारी महिन्यात स्व.अजित पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी शेती पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती केली असता त्यांनी येत्या अर्थसंकल्पात याबाबत आर्थिक तरतूद करतो व हा प्रश्न मार्गी लावतो अशी ग्वाही दिली होती..मात्र अजितदादांच्या अपघाती निधनामुळे औंध परिसरातील जनता पोरकी झाली आहे. त्यामुळे आपण स्व. अजितदादांचे खूप जवळचे मित्र आहात, त्यांनी पाहिलेले व या जनतेला दाखविलेले स्वप्न पूर्ण करून येथील जनतेला दिलासा द्यावा व ही योजना पूर्णत्वास नेण्यात यावी, अशी विनंतीही गायत्रीदेवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.