

सातारा : श्रावण सुरु झाल्यानंतर मांसाहार वर्ज्य होणार आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून आखाडी पार्ट्यांना बहर आल्याने मांसाहारावर ताव मारला जात असून खवैय्यांची चंगळ सुरु आहे. बुधवारी गटारीला शेकडो किलो चिकन-मटनाचा फडशा पडणार आहे. खवैय्यांकडून माशांवरही ताव मारण्यात येत असल्याने चिकन, मटण व मच्छी मार्केटमध्ये लाखोंची उलाढाल होत असून गटारीला आणखी वाढणार आहे.
आषाढी अमावस्येनंतर श्रावण मासारंभ होणार आहे. श्रावणात व्रत-वैकल्यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे गटारीला यथेच्छ मांसाहार करण्याची प्रथा रुढ झाली आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जात आहे. यावर्षी बुधवार दि.१२ रोजी गटारी अमावस्या असून गुरुवार दि.१३ ऑगस्ट रोजी श्रावण सुरु होत आहे औद्योगिक वसाहतीत काम करणार्या बहुतांश कामगारांचा सुट्टी असल्याने अनेकांची मंगळवारीच गटारी साजरी करण्यात आली.
बुधवारी यथेच्छ ताव मारु गुरुवारपासून श्रावण पाळला जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसांचा गटारीचे बेत आखून मांसाहारावर ताव मारण्यात येत आहे. मांसाहारी खवैय्यांकडून शेकडो किलो चिकन-मटनाचा फडशा पाडण्यात आला. काहींनी मागील काही दिवसांपासूनच मांसाहारावर जोर दिला आहे. अशा खवैय्यांकडून चवीत बदल म्हणून माशांवर ताव मारुन चीभेचे चोचले पुरवण्यात येत आहेत.