

सातारा : तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर पुणे, डोंबिवली व इंदोर येथील चार ज्येष्ठ नागरिकांनी आसाममधील तनिसुकिया ते राजस्थान सीमेवरील तनोत माता मंदिर असा सुमारे 4000 किमीचा प्रवास दुचाकीवरुन केला. आत्मविश्वास व कठोर शारीरिक श्रमाची मानसिकता असेल तर अशा प्रकारच्या मोहिमा फत्ते करु शकता हाच संदेश ज्येष्ठांच्या या प्रवासातून मिळत आहे.
दुचाकी प्रवासाच्या मोहिमेमध्ये डोंबिवलीहून 66 वर्षीय आनंद कानिटकर, पुण्यातून 62 वर्षीय विलास पेंडसे, 59 वर्षी महेश पोतदार तर इंदोर येथील 59 वर्षीय देवेंद्र डबकरा हे साठीतले तरुण सहभागी झाले होते. विलास पेंडसे व देवेंद्र डबकरा यांनी यापूर्वीही काश्मीर ते कन्याकुमारी अशी सायकल यात्रा केली होती. तेव्हाच त्यांनी पुन्हा अशाच प्रवासचा निश्चय केला होता. त्यानुसार दि. 10 ते 26 जानेवारी असा 16 दिवसांमध्ये 4000 किमीचे अंतर कापून आसाममधील तनिसुकिया ते राजस्थान सीमेवरील तनोत माता मंदिर हे ध्येय गाठले. त्यांनी भारताच्या पूर्व टोकाकडून पश्चिम टोकापर्यंतचे अंतर दोन स्कुटर व एका मोटारसायकलच्या सहाय्याने पूर्ण केले.
यामध्ये आसाममधील काझीरंगा अभयारण्य, गुवाहाटी येथील कामाख्या मंदिर, आयोध्या राम मंदिर, आग्रा येथील लाल किल्ला, फतेहपुर सिक्री, जयपूर, जोधपूर येथील किल्ले तसेच जैसलमरचे थरचे वाळवंट व भारत पाकिस्तान सीमा, लोन्मोवाला येथील 1971 च्या भारत-पाक युद्धस्मारक आदि धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार व राजस्थान राज्यांमधून या प्रवासाचा मार्ग होता. या दुचाकी प्रवाशांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.