

साखरवाडी : फलटण तालुक्यातील निरगुडी येथील एका दाम्पत्याने डाळिंब खरेदी-विक्री व्यवसायात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली सात शेतकर्यांची तब्बल 1 कोटी 44 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते (रा. निरगुडी, ता. फलटण) असे संशयित दाम्पत्याचे नाव आहे. तक्रारदार कृष्णात वसंत जाधव (रा. आसू, ता. फलटण) यांच्यासह अनेक गुंतवणुकदारांना शेअर मार्केट व डाळिंब खरेदी-विक्री (राजलक्ष्मी इंटरप्रायजेस) या व्यवसायात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देवू असे सांगून दाम्पत्याने गंडा घातला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णात जाधव यांनी 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यासाठी नोटरी करारनामा करून प्लॉट सिक्युरिटी म्हणून दिला होता. मात्र कालांतराने परतावा न देता फसवणूक करण्यात आली. तसेच इतर गुंतवणूकदार गणेश जगदाळे (17.80 लाख), दिपक जगदाळे (15 लाख), संदिप टोणगे (17.50 लाख), दयानंद वाघमोडे (3.63 लाख), सचिन तारे (46.28 लाख), धिरज जाधव (8 लाख) यांच्यासह अनेकांनी गुंतवणूक केल्याची नोंद असून त्यांनाही परतावा न देता फसवणूक करण्यात आली आहे. एकूण सात जणांची 1 कोटी 44 लाख 21 हजार 650 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि नितीन नम करत आहेत.