

नारायणगाव : ‘छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी 2030 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 400 वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचा शब्द सरकारने पूर्ण केल्याचेदेखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या अधिपत्याखाली काम करीत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानला नवी दिशा दिली.