

सातारा : सातारा जिल्ह्यातील महायुतीतील मतभेद चर्चेच्या माध्यमातून दूर केले जातील. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरे येथील आपल्या मूळ गावी माध्यमांशी संवाद साधताना ना. शिंदे म्हणाले, पालकमंत्री ना. शभूराज देसाई यांनी माझी भेट घेतली आहे. सातारा -सांगली विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची चर्चा झाली आहे. पुढील काही दिवसांत सातारा जिल्ह्यात महायुतीची संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. त्या बैठकीत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होईल. यानंतर नेते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केला जाईल. महायुती म्हणून एकत्रित काम करण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर दिल्या गेल्या आहेत.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी निवडणूक होत असून सर्वच ठिकाणी महायुतीकडे बहुमत असल्याने उमेदवारांच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीलाच महायुतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाशिक आणि जळगावमधील मतभेदांबाबतही तोडगा निघाल्याचे सांगत शिंदे म्हणाले, मंत्री गुलाबराव पाटील तसेच रेश्मा काळे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करून उमेदवारांना विजय मिळवून देतील. महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि विजयही आमचाच होईल. कोणताही प्रश्न सोडवणे किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणे हाच एक मार्ग आहे. यातून सर्व प्रश्न सुटतील. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.