

दहिवडी : माण तालुक्यातील 78 नागरिकांचे 19 लाख रुपये किमतीचे हरवलेले मोबाईल दहिवडी पोलिसांनी हस्तगत करुन संबंधितांना परत केले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हरवलेले मोबाईल शोध घेण्यासाठी दहिवडी पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस अंमलदार यांचे पथक तयार करुन दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अक्षय सोनवणे यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे हरवलेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करुन घेतली. त्यानंतर संबंधितांना भेटून व काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क करुन कारवाई केली. या करता महाराष्ट्र व इतर विविध राज्यातून चिकाटीने सदरची मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ व चोरी झालेले एकुण 78 मोबाईल परत मिळवले.
तक्रारदार यांच्या मोबाईलची ओळख पटवून त्यांना ते परत केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत जामदार, बापू खांडेकर, श्रीनिवास सानप, नितीन धुमाळ, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, असिफ नदाफ, महेश पवार यांच्या पथकाने केली.