

सातारा : राज्यातील सैनिकी शाळांचे जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन, यातील आव्हानामधील सकारात्मक द़ृष्टिकोन स्वीकारून प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांच्या माध्यमातून या शाळांना येणार्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करेन, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
सातारा येथील सैनिकी शाळेस शालेय मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली. भेट दिल्यानंतर राज्यातील 38 सैनिकी शाळांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस यवतमाळचे खा. संजय देशमुख, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, सातारा सैनिक शाळेचे प्राचार्य के. श्रीनिवासन यांच्यासह राज्यातील 38 सैनिकी शाळेचे प्राचार्य, पदाधिकारी, प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
ना. दादा भुसे म्हणाले, राज्यामध्ये सातारा व चंद्रपूर येथे शासकीय सैनिकी शाळा तर राज्यामध्ये 38 सैनिकी शाळांमध्ये 12 हजार 224 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सैनिकी शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती रुजवण्यासाठीप्रयत्न झाले पाहिजेत. या शाळा इतर शाळांपेक्षा वेगळ्या असून याच्यामागे देशप्रेम, राष्ट्रीयत्वाची भावना जोडली आहे. सैनिका शाळा देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम करतात. हे काम करताना त्यांना अनेक आव्हानांचा तसेच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.
ना. भुसे पुढे म्हणाले, मराठी मंडळाच्या माध्यमातून सीबीएससी पॅटर्नच्या चांगल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. मराठी हे आपले दैवत आहे. इतर माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे. यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राष्ट्रगीता नंतर राज्यगीत गायले पाहिजे याचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा येथील सैनिक शाळेची अभिमान वाटावा अशी कारकीर्द कायम राहीली आहे, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सातारा सैनिक स्कूलचे अभिनंदन केले. येथील शाळेच्या कामगिरीप्रमाणे काम करण्यासाठी इतर शाळांना याचा उपयोग व्हावा यासाठी सातारा येथे राज्यातील सैनिकी शाळांची बैठक घेतल्याचेही त्यांनी सांगितले.