शिखर शिंगणापूर : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापुराला येणार्या भाविकांना मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. आतापर्यंत शिंगणापूरमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असून यापुढेही शिंगणापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले. शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोनिया गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी सरपंच राजाराम बोराटे, सरपंच सारिका शेंडे, उपसरपंच राजेंद्र पिसे उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, शिखर शिंगणापूर हे अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असून याठिकाणी येणार्या भाविकांना मूलभूत सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. माझ्या आमदारकीच्या कालावधीत गेल्या 15 वर्षात शिंगणापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून यापुढेही आपण शिंगणापूर विकासासाठी कटिबध्द आहे. जिहे कठापूर योजनेतील उर्वरित 16 गावांना पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये शिंगणापूरचा समावेश आहे. लवकरच शिंगणापूर परिसरातील नागरिकांना जिहे कठापूर योजनेचे पाणी मिळणार आहे. प्रास्ताविक माजी सरपंच राजाराम बोराटे यांनी केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून व माजी सरपंच राजाराम बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षांत शिखर शिंगणापूरमध्ये सुमारे 16 कोटींची विकासकामे झाली आहेत. येथे येणार्या लाखो भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यापुढेही मूलभूत सेवासुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी गाव्ही सरपंच सारिका शेंडे यांनी दिली.