

सातारा : बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत शिष्टाई केली. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मकरंदआबांच्या शिष्टाईला यशही मिळाले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने बारामती विधानसभेसाठी पोट निवडणुकीची घोषणा केली. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच तेथे काँग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवला होता. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवारी, अंतिम मुदत होती. या पार्श्वभूमीवर मकरंद पाटील यांनी सपकाळ यांची भेट घेतली.
या भेटीत बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती मकरंद पाटील यांनी केली. यानंतर काँग्रेसचे उमेदवार मोरे यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतला. त्यामुळे या निवडणुकीत मकरंदआबांची शिष्टाई कामाला आली.