

कराड : राज्यात 26 नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यामुळे त्यापूर्वीच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी चर्चा असली तरी तसे काहीही होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सर्वजण एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत. तसेच मंत्रिपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमधील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार मकरंद पाटील, आमदार सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र सुसंस्कृतपणाची शिकवण दिली आहे. महाराष्ट्रात सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाले असले तरी विरोधकांना सन्मानाची वागणूक देऊन यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जोपासना करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या दिशेने मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे त्यांच्या विचारांने आम्ही महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे हीच त्यांना पुण्यतिथीनिमित्त खरी श्रद्धांजली ठरेल.
मुख्यमंत्री पदाबाबत ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी असे तिघे एकत्र बसून याबाबत निर्णय घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी आपली निवड झाली आहे. राज्यातील जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या युतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेले आहे. ईव्हीएमवरून व्यक्त केल्या जाणार्या शंकाबाबत ते म्हणाले, ज्या राज्यात विरोधकांचे सरकार आले, तिथे त्यांना ईव्हीएम घोटाळा दिसला नाही. मात्र ज्या राज्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तेथे त्यांनी ईव्हीएमवरून आरोप केले आहेत. निवडणुकीतील यश मतदारांवर अवलंबून असते असे सांगत ईव्हीएमवरून उपस्थित केल्या जाणार्या शंका व प्रश्न निरर्थक आहेत.
विधानसभेत विरोधी पक्ष नेते पद मिळविण्यासाठी आवश्यक आमदारांचे संख्या बळ विरोधकांकडे नाही. मात्र असे असले तरी आम्ही विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू. त्यांनी मांडलेले प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार आहोत. राज्य सर्व क्षेत्रावर आघाडीवर ठेवण्याची परंपरा कायम राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.