सातार्‍यात नारळफोड्या गँगचा सुळसुळाट; आ. शिवेंद्रराजेंची खा. उदयनराजेंवर टीका | पुढारी

सातार्‍यात नारळफोड्या गँगचा सुळसुळाट; आ. शिवेंद्रराजेंची खा. उदयनराजेंवर टीका

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात नारळफोड्या गँगचा सुळसुळाट आहे. दुसर्‍याने मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने व भूमिपूजने ही गँग सध्या करत आहे. या नारळ फोडणार्‍या गँगला हाच नारळ देऊन सातारकर घरी पाठवतील, असा खरमरीत टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी नाव न घेता खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना लगावला.

शाहूपुरीकरांना 20 वर्षे पाणी मिळाले नाही. पाण्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले असल्याची टीका खा. उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर कण्हेर पाणी योजना शुभारंभप्रसंगी केली होती. या टीकेला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. ते म्हणाले, शाहूपुरी ग्रामपंचायतीत त्यांच्याच कार्यकर्त्यांची इतकी वर्षे सत्ता होती. मग का पाणी मिळाले नाही? आपला नाकर्तेपणा लपवून त्याचे दुसर्‍यावर खापर फोडणे असले उद्योग त्यांनी बंद करावेत. सातारा शहराची हद्दवाढ सुध्दा यांच्याच राजकारणामुळे दोन वर्ष लांबणीवर पडली होती. नगर पालिकेत सत्ताधार्‍यांनी केवळ बोगस बिले काढून केवळ ‘खाण्याचे’च काम केले, असा आरोप त्यांनी केला.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्‍यात सध्या नारळ फोडणारी गँग निर्माण झाली आहे. दुसर्‍याने मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडायला ही मंडळी पुढे असते. वीस वर्षापासून सातार्‍याला पाण्यापासून वंचित ठेवले असे त्यांचे म्हणणे असेल तर, त्या वेळी ते सुद्धा खासदार होते. युतीच्या काळात ते मंत्री होते. तसेच शाहूपुरी ग्रामपंचायत पहिल्यापासून त्यांच्याकडेच राहिली आहे. येथील पंचायत समिती व झेडपी सदस्य ही त्यांचाच आहे. मग वीस वर्षापासून शाहूपुरीला पाण्यापासून वंचित कोणी ठेवले? याचा खुलासा त्यांनी करावा, असे आव्हान त्यांनी दिले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, शाहूपुरीवासियांनी तुमच्याकडे जबाबदारी दिली होती. दिलीप सोपल पाणीपुरवठा मंत्री असताना या योजनेला मंजुरी मिळाली. त्यावेळी मी स्वतः मुंबईत होतो. लोकवर्गणीची अट रद्द करण्याचा निर्णयही याचवेळी झाला. त्यावेळी ही योजना मंजूर झाली. मात्र, पुढे प्रशासकीय मान्यतेत ही योजना पुन्हा अडकली होती. परंतु अजितदादांनी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देवून गती दिली. कास योजनेलाही मान्यता मिळवून दिली. याचवेळी शाहूपुरी योजनेलाही मंजुरी मिळाली. सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय यापूर्वीच झाला असता. मात्र, त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे दोन वर्षापासून ही हद्दवाढ रखडली होती, अशी टीका देखील त्यांनी उदयनराजेंवर केली.

आता पालिकेच्या निवडणुकीत मते पाहिजेत म्हणून स्वत:चे अपयश दुसर्‍याच्या पदरात टाकण्याचे काम ते करत आहेत. यामुळेच ते भाऊसाहेब महाराजांवर विनाकारण जुने काहीतरी कारण काढून टीका करत आहेत. त्याकडे सातार्‍यातील जनतेने
लक्ष देऊ नये, असा सल्लाही शिवेंद्रराजेंनी दिला. यावेळी नगर विकास आघाडीचे प्रतोद अमोल मोहिते, फिरोज पठाण व पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button