सातारा : पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने एस. टी. कर्मचार्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांत सातारा विभागात 800 हून अधिक कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. कर्मचारी वाढल्याने एस.टी.च्या लांब पल्ल्याच्या फेर्यांमध्ये वाढ झाली आहे.
एस. टी. कर्मचार्यांच्या संपामुळे सातारा विभागातील एस. टी. सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. मात्र न्यायालयाने दि. 22 एप्रिलपर्यंत एसटी कर्मचार्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महामंडळाकडूनही कर्मचार्यांना कामावर हजर राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आजपर्यंत 520 चालक, 609 वाहक, चालक कम वाहक 103 असे कर्मचारी हजर झाले आहेत.
न्यायालयाने आदेश दिल्यापासून 322 चालक, 330 वाहक, 21 चालक कम वाहक, 94 कार्यशाळा कर्मचारी, 22 प्रशासकीय कर्मचारी काही दिवसांमध्ये हजर झाले आहेत.
कर्मचारी कामावर हजर होत असल्याने लांब पल्यासह ग्रामीण भागातील विस्कळीत झालेली एस.टी. वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच मार्गावर धावणार्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या सातारा- स्वारगेट मार्गावर 54 फेर्या धावत असून ही बस दर 15 मिनिटाला धावत असल्याने प्रवाशांचा ओढा वाढला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातारा बसस्थानकही प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. सध्या यात्रा जत्रा, लग्नसोहळे असल्याने एसटीकडे प्रवाशांची संख्या वाढली आहे.