

पाटण: चारही बाजूंनी पर्यावरण पूरक नैसर्गिक साधनसंपत्ती असताना कोयना धरणाला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत आहे.
१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सन २०१७ ते २०२६ या दहा वर्षात तब्बल ७६.५० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यावर्षी जगभरासह भारत व राज्यातही ऊन्हाचा प्रचंड तडाखा बसला आहे. यातूनच नुकत्याच संपलेल्या धरणाच्या तांत्रिक जलवर्षात ८.१२ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले असून आत्तापर्यंतच्या बाष्पीभवनातील ही सर्वाधिक तांत्रिक आकडेवारी आहे.
१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाण्याचे दरवर्षी सरासरी सात ते आठ टीएमसी पाण्याचं बाष्पीभवन होते. मागील दहा वर्षांत याद्वारे तब्बल ७६.५० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. कोयना धरणांतर्गत शिवसागर कोयना ते तापोळा (महाबळेश्वर) अशा तब्बल साडेसदुसष्ट किलोमीटर अंतरावर हा जलाशय फार मोठ्या प्रमाणावर विखुरला असला तरी इतर धरणांतील बाष्पीभवनाची तुलना केली तर कोयनेतील पाण्याचे त्यापटीत कमी बाष्पीभवन होत असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.
धरणाच्या आजूबाजूला संपूर्णपणे पर्यावरण पुरक निसर्ग असून जंगले, वन संपदेमुळे धरणातंर्गत विभागात जमिनीची धूप कमी होत असल्याने बाष्पीभवन कमी होत असल्याचा दावा आहे. तब्बल १८० चौरस किलोमीटर अंतरावरील या परिसरात तापमान, वारा, सुर्यप्रकाश, हवेतील अद्रता याचाही परिणाम बाष्पीभवनावर होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. कोयना धरणातून दरवर्षी सरासरी ७ ते ८ टीएमसी पाणी बाष्पीभवनाद्वारे ढगात जाते. या नैसर्गिक व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास गरजेचा आहे.