सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा जबडा बनला असून, अपघातातील बळींची संख्या झपाट्याने वाढत आहे. एखाद्या नैसर्गिक महामारीपेक्षा अपघातामध्ये बळी पडणार्यांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील सात महिन्यांत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 570 अपघात झाले असून, त्यामध्ये तब्बल 281 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुणी हात-पाय गमावले, तर कुणाला कायमचे अधू व्हावे लागले. या अपघातांना महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
पुणे ते बंगळूर महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्ता व सेवा रस्त्याची कामे सुरू आहेत. पुणे ते सातारा जिल्ह्यांच्या हद्दीतील महामार्गावर जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत 570 अपघात झाले. त्यामध्ये 281 जणांचा बळी गेला आहे. मार्च महिन्यात 105 अपघात झाले असून, सगळ्यात जास्त 53 जणांना जीव गमवावा लागला, तर 83 जण जखमी झाले आहेत. त्याखालोखाल मे महिन्यात 98 अपघातांत 50 जण ठार झाले, तर 95 जण जखमी झाले. एप्रिलमधील 90 अपघातांत 45 जणांचा हकनाक बळी गेला असून, 61 जणांना दुखापत झाली. जानेवारीत 79 अपघात होऊन 40 जणांचा जीव गेला असून, 58 जणांना इजा पोहोचली. फेब्रुवारीत 84 अपघातांमध्ये 38 जणांचा मृत्यू झाला असून 57 जण जखमी झाले आहेत.
जूनमध्ये 73 अपघातात 42 मृत्यू झाले असून 81 जण जखमी झाले आहेत. जुलै महिन्यात 15 तारखेपर्यंत 41 अपघात झाले असून 13 जणांना जीव गमवावा लागला. 24 जण जखमी झाले आहेत. वेगवान वाहनांमुळे बहुतांश अपघात झाले असून, हेे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कारवायांचा धडाका लावला आहे. मात्र, तरीही वाहनांचा वेग कमी झालेला नाही. अपघात हा कधीही सांगून होत नसला तरी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली तर नक्कीच अपघात होणार नाहीत. मात्र, अनेक हवसे-नवसे-गवसे चालक भलत्याच धुंदीत गाडीच्या वेगाशी स्पर्धा करत स्वतःबरोबरच दुसर्याचाही जीव घेत आहेत. सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती रात्री घरी सुरक्षित येईल का? याचा सध्या कोणालाही भरवसा नाही. अनेकदा रस्त्याची दुरवस्था व चालकाचा निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येते. अतिवेग हा सुद्धा अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे.
त्याचबरोबर घाईगडबड धोकादायक वळण, वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणाचा अभाव, वाहनाचा टायर फुटण्याची समस्या यामुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व आंतरजिल्हा मार्ग यावर हे अपघात झाले आहेत. यामध्ये राज्यमार्गावर 114 आणि जिल्ह्यातील इतर मार्गावर 229 अपघात झाले आहेत.