कराडातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी
कराड; पुढारी वृत्तसेवा : येथील मुख्य बाजारपेठेत आझाद चौक ते कन्याशाळा हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावर दुपारी 4 ते रात्री 8 या चार तासात चारचाकी वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी या नियमाचे उल्लंघन करून चारचाकी वाहन चालकांकडून या मार्गावर घुसखोरी होत आहे. मात्र असे असूनही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने कारवाई कोण करणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कराडमधील मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत 2015 साली तत्कालीन पोलिस निरीक्षक मुरलीधर मुळूक यांनी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना केल्या होत्या. यावेळी 1990 च्या दशकात बाजारपेठेतील आझाद चौक ते कन्याशाळा या परिसरात मुख्य बाजारेपेठेत चारचाकी वाहनांना मनाई करणारा आदेश काढण्यात आल्याचे लक्षात आले होते.
त्यानंतर आझाद चौक आणि कन्याशाळा या परिसरात बाजारपेठेला प्रारंभ होणार्या दोन्ही ठिकाणच्या मार्गावर त्याबाबतचे फलक लोखंडी रेलिंगवर लावण्यात आले होते आणि आजही ते लोखंडी रेलिंग दोन्ही ठिकाणी उभे आहेत. मात्र असे असूनही बाजारपेठेत दुपारी चार ते रात्री 8 या कालावधीत चारचाकी वाहनांची घुसखोरी होतच असते.
मुख्य बाजारपेठेत आझाद चौक ते कन्याशाळा या दरम्यानच्या मार्गाला पर्यायी मार्ग आहेत. मात्र या मार्गावरही मनमानीपणे पार्किंग केले जाते. सोमवार पेठेतून कन्याशाळेकडे येताना दोन विविध मार्गाचा वापर करणे शक्य आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क असतात. आझाद चौकातून कृष्णा घाट परिसराकडे जाणार्या मार्गावरही अशीच परिस्थिती असते. याशिवाय आझाद चौक ते कन्याशाळा या दरम्यान मार्गावर एका बाजूला दुचाकी पार्किंग असते. मुळात हा मार्ग अरुंद असल्याने चारचाकी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होेते.
कार पार्क करून चालक खरेदीला…
बाजारपेठेत मनाई असूनही चारचाकी वाहने विशेषतः कार मनमानीपणे घुसवल्या जातात. हे कमी की काय म्हणून वाहन चालक बिनधास्तपणे कार बाजारपेठेत पार्क करतात आणि खरेदीला निघून जातात. एका बाजूला दुचाकी पार्किंग आणि दुसर्या बाजूला कार पार्किंग यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असल्याचे पहावयास मिळते.