सातारा : एमआयडीसीतील जागा हडप करणार्‍यांचा चेहरा उघड करू : उदयनराजे भोसले | पुढारी

सातारा : एमआयडीसीतील जागा हडप करणार्‍यांचा चेहरा उघड करू : उदयनराजे भोसले

सातारा : पुढारी वृत्तसेवा औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक कारणासाठी असलेल्या जागांच्या प्रयोजनामध्ये काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी, एमआयडीसीच्या जागा अक्षरशः हडप करून स्वार्थ साधला आहे. या संपूर्ण व्यवहारात स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी, एमआयडीचे सर्व स्तरातील अधिकारी, उद्योग मंत्रालय या सर्व घटकांचे संगनमत असल्याशिवाय हे विपरित घडणे शक्य नाही, असा आरोप करत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी संबंधित प्रकाराची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी. वाट्टेल ते झाले तरी संबंधितांचा खरा चेहरा उघड करू, असा इशारा दिला.

खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोणत्याही औद्योगिक वसाहतीकरता सामान्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी हिरावून घेऊन त्या ठिकाणी गार्डन, वाणिज्य, खुली जागा, रहिवास इत्यादी प्रयोजनासाठी जागा राखून ठेवून मगच औद्योगिक कारणाकरता एमआयडीसीकडून प्लॉटसचे उद्योजकांना वाटप होत असते. मात्र, एमआयडीसीच्या या जागा स्थानिक लोकप्रतिनिधींनी हडप केल्या आहेत. एमआयडीसीत खंडणी मागितली जाते, असा आरोप करणार्‍या तथाकथित पाकिटमारांच्या पिंडामध्येच याबाबतीत चौकशी लावण्याचे धाडस नाही. मात्र अशा बाबी जेथे जेथे घडल्या असतील तेथील सर्वांची निष्पक्ष चौकशी तातडीने करावी. एमआयडीसीमध्ये अनेक कारणांनी जे प्लॉट पडून आहेत,

ते ताब्यात घेऊन नव उद्योजकांना द्यायला पाहिजेत, याकरता आम्ही मध्यंतरी मागणी केली होती. पडून असलेल्या प्लॉटच्या मंजूर ले-आऊटमध्ये हवा तसा बदल करून, मोठ्य प्लॉटचे लहान लहान प्लॉट पाडून या जागा काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी विकल्या आहेत. त्याचा लाभ शासनाला किंवा एमआयडीसीला झालेला नाही तर मधल्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या दलालांना झाला आहे आणि तो अनेक कोटीत आहे. औद्योगिक वसाहत आहे का रहिवासी-वाणिज्य वसाहत आहे असा प्रश्‍न काही ठिकाणी सर्वसामान्यांना पडत आहे. नियमात बदल करुन, हे धंदे करायचाच काही लोकप्रतिनिधींनी पान 5 वर

उद्योग सुरु केला आहे. मुळ मालकांनी जमीन औद्योगिक कारणासाठी दिली होती. उद्योग येतील, मुलाबाळांना नोकर्‍या मिळतील असा हेतू त्यांचा होता. तसेच मुळ ले-आउटमध्ये बदल करुन कोणाचा स्वार्थ साधायचा असेल तर त्याचा मूळ मालकाला लाभ दिला गेला पाहिजे. नियम धाब्यावर बसवून, ‘हम करेसो कायदा’ या धोरणातून जर कोणी मढयावरचं लोणी खात असेल तर आम्ही गप्प बसणारे नाही. दोन दिवसापूर्वी बडबड करणारे वाचाळवीर यांना याबाबतीत अंधत्व तरी आले असेल किंवा त्यांनी डोळयावर झापड ओढली असेल म्हणूनच ते याची चौकशी लावण्याचे धाडस दाखवतील, असे वाटत नाही. वाचाळवीर धाडसी नसतात. आम्ही मात्र याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहोत. उदयनराजे कोणाच्या आड येत नाहीत. परंतु सर्वसामान्यांच्या हिताआड कोणी येत असेल तर मात्र त्याचा पिच्छा सोडत नाहीत, असा घणाघाती हल्‍ला देखिल कोणाचेही नाव न घेता खा. उदयनराजे यांनी चढवला.

Back to top button