सातारा : सहापदरीकरणाचे काम दिवाळीनंतरच | पुढारी

सातारा : सहापदरीकरणाचे काम दिवाळीनंतरच

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा-कागल सहा पदरीकरणाच्या कामाच्या मागे लागलेले निविदांचे ग्रहण काही सुटण्याचे नाव घेईना. दोन टप्प्यात होत असलेल्या कामासाठी दोन पॅकेजच्या निविदा मार्चमध्ये निघाल्या. त्यातील 1 हजार 491 कोटीच्या पहिल्या पॅकेजची निविदा रद्द करून फेरनिविदा दि. 7 जुलैला निघणार आहे. 1 हजार 749.80 कोटीच्या दुसर्‍या पॅकेजची निविदा उघडली गेली पण मंजुरीची प्रदीर्घ प्रक्रिया पाहता सहापदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला दिवाळीनंतरचाच मुहूर्त शोधावा लागणार आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा-कागल सहापदरीकरणाच्या कामांना मंजुरी मिळून 3 हजार 240.8 कोटींच्या निधीची तरतूद करुन दोन वर्षानंतरही प्रत्यक्षात कामास सुरूवात झालेली नाही.

गेले दीड वर्षे तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते. पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते. गेले दीड वर्ष हेच सुरू आहे. मार्चमध्ये काढण्यात आलेल्या निविदेत पहिल्या पॅकेजसाठी आयजीएम या एकमेव कंपनीची निविदा आली होती. त्यामुळे ही प्रक्रिया जैसे थे ठेवण्यात आली. याचवेळी दुसर्‍या पॅकेजसाठी मात्र अदानी कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर होऊन त्यांची पुढील मंजुरी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

दोन टप्प्यातील या कामाच्या या दोन तर्‍हा आणि पावसाळा सुरु असल्याचे पाहता सहापदरीकरणाचे काम नव्या वर्षापर्यंत रेंगाळणार आहे. यात कागल ते पेठ नाका या 66 किलोमीटरच्या अंतरासाठी 1 हजार 491 कोटी तर पेठ नाका ते शेंद्रे या 67 किलोमीटर अंतरासाठी 1 हजार 749.80 कोटीची निविदा उघडली आहे.

दरम्यान, बांधा वापरा हस्तांतर या पध्दतीने रस्ते करण्याचे केंद्र सरकारचे धोरण होते. पण आता केंद्र सरकारने त्यात बदल केला आहे. एपीसी या धोरणानुसार स्वत:च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कागल ते सातारा सहापदरीकरणाचे काम करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी प्रकल्प किंमत निश्‍चित करून त्याप्रमाणे निविदा प्रक्रिया सुरू होत आहे.

Back to top button