कराडातील सिग्नल यंत्रणा बेभरवशी! | पुढारी

कराडातील सिग्नल यंत्रणा बेभरवशी!

कराड : अमोल चव्हाण
शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातच प्रमुख चौकात असलेली सिंग्नल यंत्रणा बेभरवशी झाली आहे. त्यामुळे केव्हाही सिंग्नल बंद पडत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांची मोठी पंचायत होते. विजय दिवस चौकातील सिंग्नल तर गेली अनेक दिवसांपासून बंद आहेत, तर काही ठिकाणचे सिंग्नल सोयीनुसार सुरू व बंद होत असल्याने याचा वाहनधारकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कराडचा विकास होत असताना शहरातील दळणवळणाची सोय चांगली असणे गरजेचे असते. मात्र, शहरातील वाहतुकीला केंव्हा शिस्त लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व सुसाट वाहतुकीला आळा घालण्यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. ती सिग्नल यंत्रणा काही ठिकाणी कार्यरत असली तरीही त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली असे म्हणता येणार नाही. अनेकवेळा सिंग्नल यंत्रणा बंद असल्याने तेथून वाहने सुसाट धावत असतात. मात्र, अचानकपणे एखाद्या दिवशी सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास ती बाब वाहनधारक किंवा नागरिकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे सिग्नल तोडून अनेक वाहने जात असताना ती आयतीच पोलिसांची शिकार बनतात. त्यातच शहरातील प्रमुख चौकांमध्ये असलेले सिंग्नल कधी सुरू तर कधी बंद असतात, हे समजून घेणे हा खरा संशोधनाचाच विषय आहे.

शहरातील वाहतूक कोंंडीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची लोकांची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आजही कायम आहे. वाहतुकीच्या कोंडीचा हा चक्रव्यूह भेदण्यासाठी पोलिस प्रशासन, नगरपालिका आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गजर आहे. यावर यापूर्वी अनेकवेळा चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना झाली नाही.
शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना झाली नाही. त्यातच रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांची वाहतुकीला मोठी अडचण होते. त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी त्यापासून वाहनधारकबोध घेताना दिसून येत नाहीत. त्यातच रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकलेले असते. त्याचाही अनेकवेळा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

सिग्नल बंद… वाहने सुसाट…

सध्या कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्याने व लग्नसराईची लगबग सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्यामुळे खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. अशा परिस्थितीत बंद असलेल्या सिंग्नलमुळे अनेक चौकात वाहने सुसाट धावत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button