सातारा पुढारी वृत्तसेवा : लष्करी दलांना प्रमुखांसह सर्वोत्तम अधिकारी देणार्या सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सातारा सैनिक स्कूलमध्ये सुमारे 10 मुलींना प्रवेश देण्यात आला असून सैनिक स्कूलमधील मुलींची पहिली बॅच आहे. त्यामुळे सैनिक स्कूलमधून आता महिला अधिकारी घडण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने 23 जून 1961 रोजी देशातील पहिले सैनिक स्कूल सातार्यात सुरु झाले. सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या सैनिक स्कूलने देशाला संरक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी दिले त्यामुळे या सैनिक स्कूलचा देशभर नावलौकिक राहिला आहे.
सैनिक स्कूलच्या निवासी शाळेत सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण दिले जात आहे. सध्या सैनिक स्कूलमध्ये सुमारे 640 विद्यार्थी शिकत आहेत. सैनिक स्कूलमध्ये यापूर्वी मुलांना प्रवेश दिला जात होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय गतवर्षी शासनाने घेतला होता. त्यामुळे 61 वर्षात प्रथमच सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींच्या शिक्षणासाठी प्रथमच खुले झाले आहेत.
सुमारे 611 मुलींनी सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा दिली होती. त्यातून 10 मुलींची निवड झाली आहे. यावर्षी 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी 1 हजार 450 मुलींनी 10 जागांसाठी अर्ज केले आहेत. त्यातून 10 मुलींची निवड सैनिक स्कूलसाठी केली जाणार असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
चालू शैक्षणिक वर्षात 10 मुली सैनिक स्कूलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे देशातील पहिल्या असलेल्या या सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरु झाले आहे. 17 फेब्रुवारीपासून या मुली सैनिक स्कूलमध्ये दाखल झाल्या आहेत.
शाळेत दाखल झाल्यापासून त्या प्रचंड आत्मविश्वासाने आणि उत्साहाने शैक्षणिक उपक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. सातारा सैनिक स्कूलमधील या मुलींची पहिली बॅच असल्याचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे, उप प्राचार्य विंग कमांडर बी. लक्ष्मीकांत, प्रशासन अधिकारी कर्नल प्रमोद पाटील, वरीष्ठ शिक्षक प्रेम गेई यांनी सांगितले.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 10 मुलींना सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये उत्तरा जयंत भवाल, इशा कुमारी (पश्चिम बंगाल), अदिती संजयकुमार कश्यप(बिहार), अंशिका शामराव ननावरे, श्रावणी दिपक वाघ, सिध्दी रोहन रावखंडे, सिध्दी संदीप गंगतिरे, याना शंकर तोटावार, पीयूशा जितेंद्र चव्हाण, रिथा महेंद्र धोंडी (महाराष्ट्र) यांचा समावेश असून सर्व मुली निवासी आहेत. तर श्रेया अंगद, प्रतिक्षा सोनावर व वैभवी रोड्डे या सैनिक स्कूलच्या स्टाफ मेंबरच्या मुली असल्याने त्या अनिवासी आहेत.
सैनिक स्कूलमध्ये दाखल झालेल्या मुली बारावीनंतर एनडीएसाठी पात्र ठरतील त्यासाठी पहिल्यापासूनच सैनिक स्कूल प्रशासनामार्फत तयारी केली आहे.
-विंग कमांडर बी. लक्ष्मीकांत उप प्राचार्य, सैनिक स्कूल सातारा