Udayanraje Bhonsle : अजिंक्यतारा कारखान्यातील भ्रष्टाचार उघड करणार : उदयनराजे | पुढारी

Udayanraje Bhonsle : अजिंक्यतारा कारखान्यातील भ्रष्टाचार उघड करणार : उदयनराजे

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती घराण्याचा वारसा सांगताना महाराजांचे आचार-विचार आचरणात आणून जोपासले पाहिजेत. चांगल्या कामांमध्ये राजकारण आणून काही लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करीत बदनाम केले जात आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारी संस्था स्थापन केल्या जात आहेत. अजिंक्यतारा कारखान्यांमधील शेअर्सदार हा प्रत्येकजण कारखान्याचा मालक आहे. ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, असे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी म्हटले आहे.

कारखान्याच्या नावाखाली चाललेला अतिरेक हा कुठेतरी थांबवला पाहिजे. कारखाना हा लोकांच्या कष्टावर उभा केलेला आहे. कारखान्याच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार झाला आहे आणि तो वेळ आली की मी उघड करणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुद्दामहून गळचेपी केली जात आहे, असा आरोप कोणाचेही नाव न घेता उदयनराजे (Udayanraje Bhonsle) यांनी केला.

साबळेवाडी (ता.सातारा) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी साबळेवाडी येथील पाण्याची टाकी, गावातील अंतर्गत व उपकेंद्राकडे जाणारा रस्ता आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माजी सभापती सुनील काटकर, युवा नेते संदीपभाऊ शिंदे, बाळासाहेब गोसावी, नाना शिंदे, बाळासाहेब ननावरे, माजी सरपंच रामदास कडव, विश्वजीत लाड, अशोक चांगण आदी उपस्थित होते.

पुढे उदयनराजे भोसले म्हणाले, मी कुणालाही शत्रू न समजता नेहमीच मित्र समजतो. परंतु तत्त्वाशी मी कधीही तडजोड करत नाही आणि करणारही नाही. मग तो आमच्या घरातला किंवा कोणीही असो.आज-काल सगळीकडे भ्रष्टाचार असल्याने त्यांना सर्वच भ्रष्टाचारी दिसत आहेत. प्रत्येकजण हा भ्रष्टाचारी नसून त्यांना स्वतःचा काहीतरी स्वाभिमान असतो. आणि तो स्वाभिमान आम्ही पाळतो.

दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावताना त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावे. विनाकारण सर्वसामान्य लोकांना चेंगरण्याचे काम करू नये. काय? असेल ते माझ्याशी बोला. मी खंबीरपणे रामदास कडव यांच्यासह भागातील लोकांच्या पाठीशी उभा आहे. येथील लोक लबाड असते तर निवडणुकीत सोसायटी त्यांनी घेतली नसती,असेही यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमावेळी सरपंच सौ. सुषमा जाधव, प्रभावती कडव, उपसरपंच विनय कडव, धर्माजी बाबर, प्रताप जाधव, नितीन कडव, काशिनाथ जाधव, सोपान साबळे, बबन वाघमळे, मारुती घागरे, विशाल जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक लक्ष्मण कडव यांनी केले. आभार चंद्रकांत कडव यांनी मानले.

Back to top button