सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कृष्णा नदीच्या पाणीपातळीकडे लक्ष देऊन आहे. पाणी पातळी 25 फुटापर्यंत गेल्यास 29 फूट पाणी पातळीने बाधित नागरिकांना अलर्ट देण्यास सुरुवात केली जाईल. पाणी पातळी जसजशी वाढेल, तसतसे संबंधित भागांना अलर्ट केले जाईल. पूरपट्ट्यातील 2 हजार कुटुंबांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी स्थलांतराच्या नोटिसा दिलेल्या आहेत, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
आयुक्त कापडणीस म्हणाले, सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 20 फूट इतकी आहे. पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहोत. पाणीपातळी 29 फुटापर्यंत गेल्यास पुराचे पाणी नागरी भागात शिरण्यास सुरूवात होते. पाणीपातळी 30 फुटापर्यंत गेल्यास सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी येते. पाणीपातळी 31 फुटापर्यंत गेल्यास इनामदार प्लॉट (शिवनगर) येथे पाणी येते. पाणी पातळी जसजशी वाढत जाईल, तसतसे नागरी भागात पाणी शिरू लागते. त्यामुळे पाणीपातळीकडे लक्ष ठेवून आहोत.
महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे. पूरपट्ट्यातील 2 हजार कुटुंबांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी स्थलांतराच्या नोटिसा दिलेल्या आहेत. पाणीपातळी 25 फुटापर्यंत गेल्यास 29 फूट पाणी पातळीने बाधित होणार्या नागरिकांना अलर्ट करण्यात येईल. पाणीपातळी जसजशी वाढत जाईल, तसतसे संबंधित भागातील नागरिकांना अलर्ट करण्यात येईल. महापालिकेच्या बोटी सज्ज आहेत. मदत, सुटका यंत्रणा प्रभावीपणे काम करेल. पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रांची तयारी करून ठेवलेली आहे, अशी माहिती आयुक्त कापडणीस यांनी दिली.