सांगली पुढारी वृत्तसेवा; संदीप पाटील : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वेध कडेगाव तालुक्यातील इच्छुक मंडळींना लागले आहेत. त्यासाठी काही इच्छुकांनी गावोगावी संपर्क वाढवला आहे. काहींनी नेत्यांकडे मोर्चाबांधणीची तयारी सुरू केली आहे. सर्वांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
कडेगाव तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून कदम-देशमुख गटाचे प्राबल्य आहे. गेल्या अनेक निवडणुका या दोन्ही गटात मोठ्या संघर्षाच्या व अटीतटीच्या झाल्या आहेत. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने पलूस व कडेगाव या दोन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषद गटावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
दोन्ही पंचायत समितीवरही एकहाती सत्ता मिळवली होती. त्या पराभवाची सल आजही कदम गटास कायम आहे. त्यामुळे काँग्रेस पाठीमागील पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव करीत एकहाती सत्ता हस्तगत केली आहे. तेव्हापासून भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास आणखी दुणावला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. सध्या आमदार लाड यांनी या मतदारसंघात आपले राजकीय बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसकडून कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, शांताराम कदम, डॉ. जितेश कदम सक्रिय आहेत. भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सतीश देशमुख सक्रिय झाले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपल्याने नेत्यांनी व इच्छुकांनी संपर्क व भेटीगाठीवर भर दिला आहे. लग्न, समारंभ, वाढदिवस, सांत्वनपर भेट अशा ठिकाणी सर्वच पक्षातील नेते मंडळी यांची वर्दळ वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.