सांगली : मिनी मंत्रालयासाठीच्या इच्छुकांना धक्का

सांगली : मिनी मंत्रालयासाठीच्या इच्छुकांना धक्का
Published on
Updated on

सांगली : शशिकांत शिंदे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचनेत अनेक गट आणि गणात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यासाठी तयारी केलेल्या अनेक इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. राजकारणात येणार्‍या इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा एक चांगला मार्ग मानला जातो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेकांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत जायचेच यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाची प्रभाग रचना तयार करताना मोठी फोडाफोडी झाली आहे. नव्या मतदारसंघात गावेच बदलली गेल्याने अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. काही जणांनी जुन्या मतदारसंघात तयारी केली होती, त्यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. तब्बल पन्नासहून अधिक मतदारसंघाची फोडाफोडी झाल्याचे दिसून येत आहे. वाळवा तालुक्यात जिल्हा परिषदेचे येलूर आणि कामेरी हा गट रद्द करण्यात आले आहे. महाडिक गटाचे हक्काचे मतदारसंघ फुटल्याने तो त्यांना धक्का मानला जात आहे. शिराळ्यामध्येही राष्ट्रवादीला अनुकूल स्थिती असल्याचे मानले जात आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. यावेळी काँग्रेसमध्ये शांतता असल्याने राष्ट्रवादी सुसाट जाण्याची शक्यता आहे. तासगाव तालुक्यात यावेळीही राष्ट्रवादीला अनुकूल स्थिती राहण्याची शक्यता आहे. खानापूर तालुक्यात मतदारसंघातील गावांची फोडाफोड झाली. येथे शिवसेनेचे आ. अनिल बाबर गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे तालुक्यात त्यांना यावेळी अनुकूल स्थिती आहे. पलूस तालुक्यात काँग्रेसच वरचढ राहणार असल्याचे सध्याचे चित्र दिसते. कडेगाव तालुक्यात भाजपला गड राखण्याचे आव्हान वाढले आहे. तालुक्यात काँगे्रेस विरुद्ध भाजप असा सामना होणार असल्याचे सध्याचे चित्र दिसते आहे.

प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाकडे लक्ष

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जाहीर केलेली प्रारूप प्रभाग रचना बहुतेक कायम होणार आहे. आता आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष आहे. महिलांना पन्नास टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे महिला राखीव झाल्यास पत्नीला किंवा राखीव जागेवर आरक्षण पडल्यास जवळच्या कार्यकर्त्याला उभे करून निवडून आणायचे, असा प्रयत्न अनेक इच्छुकांचा आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रभाग रचनेवर राष्ट्रवादीचा वरचष्मा?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. तरीसुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघ तयार करताना राष्ट्रवादीला अनुकूल असे मतदारसंघ तयार केल्याची चर्चा आहे. काही नेत्यांनी तसा आरोपही केला आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असणार आहेत. आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना तर विरोधी भाजप कशी व्यूहरचना आखणार याबाबत उत्सुकता असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news