जत : विजय रूपनूर जत तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागासाठी म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना वरदान ठरली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनामुळे तालुक्यातील अनेक बंधारे, नाले, मातीनाला बांध, पाझर तलाव, साठवण तलावात पावसाळ्यापूर्वीच पुरेसा पाणीसाठा झाला आहे. ही योजना 32 गावांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.
तालुक्यातील अनेक गावांना या योजनेतून एकीकडे पुरेसे पाणी उपलब्ध होत आहे. दुसरीकडे वंचित असलेली 65 गावे तहानलेली आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा तालुक्यातील 32 गावांना लाभ झाला आहे. लाभक्षेत्रातील जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. बंदिस्त पाईपलाईनद्वारे उमदीपर्यंत पाणी पोहोचले आहे. योजनेचे अजूनही दहा टक्के काम अपूर्ण आहे. बंदिस्त पाइपलाईनद्वारे शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचावे या हेतूने 100 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
सिंचन योजनेतून 1 टीएमसी पाणी कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या म्हैसाळच्या लाभ क्षेत्रात सोडले आहे. परंतु, लाभधारकांकडून पाणीपट्टी वसुलीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. 2 कोटी 30 लाख पाणीपट्टी प्रस्तावित आहे. यातील फक्त तीस लाख इतका पाणीकर शेतकर्यांनी भरला आहेत. उर्वरित दोन कोटी पाणीपट्टी थकीत आहे.
या योजनांचा हिवरे, वायफळ, मोकाशेवाडी, आवडी, धावडवाडी, डफळापूर, बाज, शेगाव, बिरनाळ, कुंभारी, बागेवाडी, प्रतापपूर, तिप्पेहळी, रेवनाळ, बनाळी, सनमडी, घोलेश्वर, खैराव, टोणेवाडी या गावांना लाभ झाला आहे. सांगोला तालुक्यातील सांगोला वितरकेद्वारे हंगिरगे, पारे, घेरडी, हबिसेवाडी, डिस्कळ, नराळे या गावांना पाणी दिले आहे.