

जत : मोटारसायकलवरून घरी परतत असताना वीज पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. आयाज फिरोज मुजावर (वय 24, रा. बाज) असे मृताचे नाव आहे.
कंठी (ता. जत) येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत होते. पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. आधी तुरळक पावसाच्या सरी पडल्या होत्या. आयाज व त्याचे मित्र कंठी येथे मुरघास तयार करत होते. विजेचा कडकडाट सुरू असल्याने बाज या गावी ते मोटारसायकलवरून परतत होते. त्यावेळी त्यांच्यावर वीज पडल्याने आयाज जागीच ठार झाला, तर नारायण शिवाजी हाके (24, रा. बाज) हा बचावला. एक अल्पवयीन तरुण जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आयाजला तातडीने कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
टोणेवाडी, येळवीतही हानी
येळवी परिसरात वीज कोसळल्याने लक्ष्मण गायकवाड यांच्या शेतातील विद्युत खांब कोसळले. टोणेवाडी येथील अंकुश टोणे यांच्या घरासमोरील कडब्यावर वीज पडल्याने कडबा पेटला.